Wednesday, February 8, 2012

क्रिस्तोफ वैलिकी

क्रिस्तोफ वैलीकी,सर्व १४ एट थाऊंजडर(आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच) हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित दोन लेख/बातम्यांचा एकत्रित ब्लॉग. त्यावेळी 'लोकसत्ता'साठी लिहले होते, काही कारणास्तव प्रसिद्ध होऊ शकले नाही,आजच्या वातावरणात पुन्हा मांडावेसे वाटले.   

--------

गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या...                   

"ते सारे 'हाय अल्टिट्यूड टुरिस्ट' आहेत. गिर्यारोहक आणि गिरिपर्यटक यामधील फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. एव्हरेस्ट अथवा तत्सम वलय असलेले शिखर चढून जायचे एवढीच गिरिपर्यटकांची इच्छा असते. त्यापुढे जाऊन डोंगराची आस किती आहे आणि ते पुढे अन्य किती शिखरांवर आरोहण करतात हा मुद्दा महत्वाचा आहे." जगातील १४ च्या १४ एट थाउजंडर हिमशिखरांवर यशस्वी आरोहण केलेले प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी सांगत होते. फेब्रुवारी २०११मध्ये दोन दिवसांच्या भारत भेटीवर ते मुंबईत त्यांच्याशी संवाद साधला. 


मोहिमेचा रूट आधीच तयार केलेला, रोप लावलेला आहे,साधनसामग्रीसाठी, पोर्टर मोठया प्रमाणात आहेत अशा परिस्थिती केलेले गिरिपर्यटन म्हणजे व्यापारी गिर्यारोहण मोहीम, तर याच्याबरोबर उलटी परिस्थिती गिर्यारोहकांच्या बाबतीत आढळते असे त्यांचे म्हणणे. अर्थातच क्रिस्तोफ यांचे स्वत:चे सारे गिर्यारोहण या दुसऱ्या पद्धतीनेच झालेले. सहा एटथाउजंडर हिमशिखरांचे आरोहण करताना तर डोंगरवर ते फक्त एकटेच होते. आजकालच्या व्यापारी तत्वावरील गिर्यारोहण मोहिमांविषयी बोलताना ते म्हणाले,'डोंगरावर आपण कोणा एकाची मालकी सांगू शकत नाही, पण व्यापारी मोहिमांनी काही तत्वे पाळावीत अशी ते अपेक्षा करतात. हे थांबवणे अवघड आहे. हे गिरिपर्यटक लिहतात तेदेखील फक्त स्वत:च्या बाबतीत, त्यामध्ये डोंगर खूप कमी असतो. त्यामुळे या गोष्टीना किती महत्व द्यायचे हा खरा प्रश्न आहे."

क्रिस्तोफ यांनी आजवर अनेक गिर्यारोहण मोहिमा केल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे सहा एटथाउजंडर हिमशिखरांवर त्यांनी फक्त एकट्यानेच आरोहण केले आहे.संपूर्ण डोंगरावर फक्त एकच माणूस. कोणी सोबतीला नाही, काही संदेश द्यायचा तर आजच्यासारखी प्रगत साधने देखील नाही, अशा मोहिमा केल्यावर अर्थातच आजचे व्यापारी वातावरण त्यांना खटकणे स्वाभाविकच. ते स्वत: कधीच त्या वाटेला गेले नाहीत. पण गिर्यारोहकाला पॅशन असणे महत्वाचे असल्याचे ते सांगतात. व्यापारी मोहिमात नेमकी या पॅशनचीच कमतरता असते, असे त्यांचे म्हणणे.आजकाल एखादे हिमशिखर चढून गेल्याचे जाहीर केल तर त्यावर पुरावे मागितले जातात. पण क्रिस्तोफ यांना आजवर कधीच कोणी कसलाही पुरावा मागितला नाही, कारण विश्वास. 

क्रिस्तोफ म्हणतात "तुमचा डोंगरावरच, तुमच्या स्वत:वरचा, आणि लोकांचा आपल्यावरचा. असे सर्व असेल तर मग कोणतीच गिर्यारोहण मोहीम कठीण नाही. किंबहुना हे सर्व होते म्हणूनच एकट्याने आठ हजारवर मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर आरोहण करता कधी भीती जाणवली नाही कधी कोणी त्यावर अविश्वास दाखवला नाही.

क्रिस्तोफ यांनी चक्क कडाक्याच्या हिवाळ्यातदेखील एव्हरेस्टवर आणि त्याहीपेक्षा अवघड अशा के टु हिमशिखरावर यशस्वी आरोहण केले आहे. असे करणारे ते पहिलेच गिर्यारोहक. पण असे धोकादायक धाडस करणे कितपत योग्य आहे यावर ते म्हणतात, "या सर्वासाठी तुम्हाला प्रचंड अनुभवाची गरज असते. भरपूर सराव आणि डोंगराशी मैत्री तुम्हाला हे बळ देवू शकते आणि त्यातूनच मग असे विश्वविक्रम होवू शकतात. नेमके आज याचा अभाव असल्याचे त्यांना जाणवते. अर्थातच आजकाल करिअरमुळे तरुणांना एवढा वेळदेणे शक्य नसल्याचेदेखील ते मान्य करतात. क्रिस्तोफ यांनी २०११ च्या हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमात गिर्यारोहण विषयक विशेष व्याखाने दिली होती. 

*************************************************************

क्रिस्तोफ वैलिकी – एक अवलिया

ब्रॉड पिक, लोधसे, धौलागिरी, शिशपग्मा, गशेरबर्म, नंगा पर्वत या सर्व आठ हजार मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर एक आरोहक केवळ एकट्यानेच जातो, दूरदूर लांबवर कोणीही नाही, अपघात झाला तरी, कोण, केव्हा उपचार करेल माहिती नाही, संदेश पाठवायची प्रगत साधने नाहीत. आहे काय तर फक्त एकच लक्ष्य, शिखर माथा गाठायचा. शिखरावर आरोहण केल्याचा आनंद व्यक्त करायचा तो निसर्गाबरोबरच. हे सगळे कोणत्याही चित्रपट शोभेल असे वर्णन आहे प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी यांच्या आजवरच्या थरारक गिर्यारोहण मोहिमांचे. नुसतेच एकट्याने आरोहण नाही तर एकदा बेस कॅम्प सोडला थेट शिखर असे सलग सोळा सतरा तास त्यांनी आरोहण केले आहे तेही पारंपारिक मार्ग न घेता.

हे नुसते एकट्याने आरोहण करणे कमी म्हणून की काय हा महाशयांनी आणखीनही काही उद्योग केले. भर हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे ४५ असते, १००-१५० मीटर ताशी वेगाने वारे वाहत असतात, दिवसादेखील बर्फावरून चालणे त्रासदायक असते अशा वेळी चक्क एव्हरेस्टवरच स्वारी केली. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच आरोहण होते. इतकेच नाही तर पुन्हा कानचेनजुंगा आणि लोधसे पण हिवाळ्यात सर केले. 

असे हे जगावेगळे व्यक्तिमत्व हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने (२०११) भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबईतील गिर्यारोह्कांसमोर आपले अनुभवकथन तर केलेच पण थोडे उपदेशाचे डोसदेखील पाजले.

क्रिस्तोफ यांचे हे सर्व उद्योग पहिले तर वाटते की, या माणसाचा जन्म डोंगरासाठीच झाला आहे. त्यांच्या हाडामासात गिरीप्रेम भिनले आहे. एकट्याने शिखर आरोहण केल्यावर आनंद कुठे व्यक्त करायचा हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही की, आपण या शिखरावर होतो याचा काही पुरावा गोळा करावा अशी देखील कधी गरज भासली नाही. आनंद व्यक्त करत बसण्यापेक्षा आरोहणावर जास्तीत जास्त लक्ष कसे केंद्रित करता येईल, यावर सगळा भर. आनंद साजरा करायचा तर घरी गेल्यावर  किंवा बेस कॅम्पला करू, कारण डोंगर उतरताना सर्वात जास्त अपघात झाले आहेत, त्यामुळे ती काळजी आधी. 

पुराव्याचे म्हणाल त्यांनी फक्त नंगा पर्वतवर फोटो काढले आणि तेथे पूर्वी कोणीतरी ठेवलेला एक स्कार्फ आणि पिटॉन बरोबर घेतला. याच नंगा पर्वतावर जाताना बेस कॅम्पलादेखील कोणी नव्हते. शिखरावरील त्यांची सारी हालचाल खालचे गावकरी मोठ्या दुर्बिणीतून न्याहाळत होते, पण क्रिस्तोफना याची कल्पनाच नव्हती. थोडक्यात सारे काही डोंगरासाठीच असेच त्यांचे जीवन आहे.

इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाल्यावर १३ वर्षाची नोकरी चक्क सोडून दिली. महिन्यातून ३ -४ महिने काम करायचे आणि मग बाकी सर्व काळ डोंगरात असे याचे आयुष्य. बर नोक-या तरी कोणत्या केल्या. एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या साहेबाला गाठून मोहिमेसाठी मदत मागायची त्यासाठी त्याच्या उंच उंच इमारतीवर नाव टाकणे, मोठ्या चिमण्यावर नाव टाकणे अशी काही कामे करायची. तो साहेब पण मोहिमेला मदत म्हणून अशी काम उदारपणे द्यायचा. फिशिंग वैगरे अन्य काही अर्थार्जनाचे उद्योग धंदे पण केले. पण सगळा भर तो उंचावर जाण्याचा. क्रीतोफनी आजवर ३० एक मोठ्या मोहिमा केल्या आहेत, छोट्या छोट्या मोहिमांची तर गणतीच नाही.  कधी कधी सोलो क्लाईम्बिंग व हिवाळ्यातील आरोहणावर गिर्यारोहण क्षेत्रातून आक्षेप यायचे. पण क्रिस्तोफ म्हणतात, तुमचा अनुभव महत्वाचा त्या जोरावर तुम्ही विश्वास कमवता. स्वत:वर आणि जगावर. डोंगर तर तुमचा सखासोबती असतोच. अतिशहाणणा नसेल तर हे सर्व तुम्ही आरामात करू शकता. 

व्यापारी मोहिमांबाबत देखील त्यांचे मत महत्वाचे आहे. त्या थांबवणे अवघड आहे पण त्यातून गिरीपर्यटक तयार होतात आणि दुसरीकडे गिर्यारोहक घडतो. जो स्वत:च्या आयुष्यातदेखील खूप धैर्याने समोर जातो. स्वत: क्रिस्तोफ तर कधीच डगमगले नाहीत मग ते डोंगर असो कि कुटुंबातील अडचणी. स्वत:च विटा रचून स्वत:च घर बांधले. अनेक अपघात, सहका-यांचे मृत्यु डोळ्यादेखत झाले. मोठ्या अपघातानंतर देखील लोधसे शिखरावर यशस्वी आरोहण केले.  हे सर्व त्यांना डोंगराची सोबत होती म्हणूनच.  आज ६१ व्या वर्षी देखील न चुकता दरवर्षी हिमालयात जात असतात. पोलंडमध्ये स्वत:ची केटू  स्पोर्ट नावाची संस्था आहे. हाडाचा गिर्यारोहक कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे.

---समाप्त---

No comments:

Post a Comment